२१ वे शतक , आधुनिक आणि मनाला प्रगल्भ व बुद्धीला अधिक तेजस्वी करणारे शतक म्हणून पाहिलं जातं ... या २१ व्या शतकातील बंजारा स्त्रीयांची कौटुंबिक , सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक .स्थिती _दिशा आणि दशा या बाबत आपण विचार करणे गरजेचे आहे...
बंजारा स्त्री चे वास्तव जीवन या सर्व गोष्टीतून बघण्याची आज आवश्यकता का भासते ?
याचं उत्तर अजूनही, बंजारा स्त्रीयांचा जीवन प्रवास , 'कडापो ' म्हणजे दुःखाच्या कठीण रस्त्यावरुनच सुरु आहे.. हे वास्तव कुणीही नाकारु शकत नाही..
कौटूंबिक बाबतीत विचार केला तर असे दिसून येते की , बंजारा स्त्रीच्या अंतरीक ऊर्जेला ८५ % घरात कौटूंबिक विरोध असतो.
काळानुरुप संघर्ष तीचा सुरुच आहे.कौटूंबिक स्थिती मजबूत करतांना , विविध पातळीवर तिची दमछाक होते.परिणामी बहुतांश स्त्रीया ' अंधश्रद्धा व घातक रुढींच्या शिकार होतांना दिसत आहेत... तांडा सोडून शहरात वास्तव्य करणाऱ्या स्त्रीया सुद्धा आपलं दुःख मनात ठेवून जीवन जगतांना दिसत आहेत... नोकरी व व्यवसाय करणाऱ्या २० % स्त्रीयांना सुद्धा काही प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या कौटुंबिक संघर्षाला सामोरे जावे लागते.
सामाजिक कार्य करुन आपले स्वतंत्र अस्तिव निर्माण करणाऱ्या महिलांवर पण टिका करण्याचे प्रकार काही अंशी सुरु आहेत.
राजकिय क्षेत्रात ग्रामिण ते राज्यपातळीवर कार्य करणाऱ्या , काही लोकप्रतिनिधी बंजारा महिलांना आपले कार्य स्वतंत्रपणे करता येत नाही..
महिलांचे पती किंवा मुलं अथवा कुटूंबातीत इतर पुरुष मंडळी स्वतः पुढारपणाचा आव आणतात .. त्यामुळे पदावरील महिला सक्षमपणे कार्य करु शकत नाही. समस्त स्त्रीयांची समस्या समर्थपणे मांडू शकत नाही.
शैक्षणिक _ म.फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या शैक्षणिक जागरातून ' तांडयाच्या झोपडया ' जागल्या. तांडा शिक्षण घेण्यास पुढे येऊ लागला. तांडयाच्या झोपडयांमधून शिकून नवी ध्येय गाठणारी बंजारा कन्या , आज अनेक क्षेत्रात कार्यरत आहे..
सरकारी नोकरीत कार्यालयीन शिपाई ते प्रशासकिय अधिकारी पदापर्यंतचा या सर्व बंजारा हरपणींचा प्रवास एक आशेचा किरण म्हणून पाहिला जातो.
क्रिडा क्षेत्रात सुद्धा बंजारा स्त्री स्वतंत्र ओळख निर्माण करतेय... शिक्षणाने आज बंजारा स्त्री , अभियांत्रिकी , वैदयकिय, शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र व समर्थपणे उभी आहे.. या प्रेरणेने तांडयाचा शिक्षणरथ वेगाने दौडायला लागलाय.
तरी सुद्धा शिक्षण घेवून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या बंजारा भगिनींनी तांड्यातल्या इतर मुलींना प्रेरणा देण्याचे कार्य करणे गरजेचे आहे..
'तारी कल्पनाती
उची जागाप चलोजो
हेट छ ,ओनुनबी उपर लेजो
लायक बणन नायक व्हेजो
सेवा करन सारीरी
सेवा तु रे व्हेजो '
हा 'सेवा विचार ' रुजविण्याची गरज आहे...
सांस्कृतिक क्षेत्रात - बंजारा लदेणी काळात सांस्कृतिक क्षेत्रात बंजारा स्त्रीयांची आघाडी होती. सध्या मात्र सर्वच पातळ्यांवर संघर्ष करतांना बंजारा स्त्रीयांची होणारी दमछाक ,सांस्कृतिक क्षेत्रात मागे राहण्याचे कारण म्हणावे लागेल... बंजारा संस्कृतीची
पारंपारिकता जपत आधुनिकतेचा स्विकार करण्याची गरज आहे..
डिसेंबर मध्ये नागपूर येथे झालेल्या बंजारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मा.सुनिता ताईंना मिळाला.. त्यामुळे साहित्य क्षेत्रात अधिक प्रभावी कार्य करण्याची नवी ऊर्जा बंजारा महिला वर्गात निर्माण झाली ... ही आनंददायी बाब आहे..
.... 🙏🙏
दशा -शिक्षणामुळे आपला जीवनसाथी स्वतः निवडण्याची क्षमता बंजारा युवती मध्ये निर्माण झाली.. तरीही काही प्रमाणात सामाजिक अडसरांची शिकार तिला व्हावं लागत आहे..
फेसबुक , what's app, युट्यूब या समाज माध्यमावर शिक्षण घेतलेली बंजारा स्त्री थोड्याफार प्रमाणात व्यक्त होतेय... YouTube वर सुद्धा खूप असे videos बघायला मिळतात जे बंजारा संस्कृतीचे विशाल दर्शन घडवितात पण काही व्हिडीओ सांस्कृतिक विकृतीकरणाचे माध्यम होत आहेत असं वाटतयं.. या कडे पण लक्ष देण्याची गरज आहे..
दिशा -
२१ व्या शतकात बंजारा स्त्री समर्थ पणे उभी रहावी , यासाठी तिचं शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे.कुटूंबियांनी या कडे लक्ष देण्याची गरज आहे. तिच्या पंखांना बळ देण्यासाठी कौटूंबिक ऊर्जा , एक नवी प्रेरणा आहे.. स्त्रीयांनी सुद्धा साहित्य क्षेत्रात पुढे आले पाहिजे.. स्वतःचे दुःख शब्दातून मांडले पाहिजे.. तांडयातील समस्त स्त्री जीवना पुढील आव्हाने कथा , कविता , कादंबरी या माध्यमातून पुढे आले पाहिजे. वैद्यकिय , शिक्षण , आरोग्य , कायदा व प्रशासनिक क्षेत्रात कार्यरत महिलांनी पुढे आले पाहिजे.. सामाजिक घातक प्रथांना विरोध करुन , बंजारा समाजातील समस्त स्त्री वर्गाचा ' कडापो ' दूर केला , तिच्यात आत्मविश्वास व नवी प्रेरणा निर्माण व्हावी या साठी संवाद वाढविला पाहिजे... ' जुनं सोडता येईना, नवं घेता जमेना ' अशा द्विधा परिस्थितीत अडकलेल्या बंजारा स्त्रीला ' वाचन , चिंतन मनन , करण्याची हिंमत या तंत्रयुगात देण्याची गरज आहे..
समाजातील विविध सामाजिक संघटनांनी , राजकिय क्षेत्रात कार्यरत घटकांनी सुद्धा बंजारा स्त्रीयांच्या उत्कर्षाच्या बाबतीत स्वतंत्र कृती कार्यक्रम राबविला पाहिजे..
२१ व्या शतकातील बंजारा स्त्रीयांची कौटुंबिक , सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक .स्थिती _दिशा आणि दशा या बाबत आपण विचार करणे गरजेचे आहे...
.....
एकनाथ गोफणे.....
२--------लेख
'आद्य संस्कृतीचा मानबिंदू '
'आदय संस्कृतीचा मानबिंदु 'हे ब्रीदवाक्य घेवुन महाराष्ट्र राज्यात आदिवासी साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणारे , एकमेव विचारपीठ ,आदिवासी साहित्यासाठी असलेली चळवळ म्हणजे आदिवासी साहित्य अकादमी ..
या आदिवासी साहित्य अकादमीने ‘शाहू फुले आंबेडकरांची प्रेरणा घेऊन वंचितांचा आवज होण्याचा प्रयत्न सुरु केलाय...
२०१२ पासून या अकादमीने साहित्याच्या क्षेत्रात दमदार पाऊले टाकायला प्रारंभ केला.
. यापूर्वी जळगाव जिल्हयातच ३ संमेलने झालीत., टाकळी प्र.चा.,कजगाव , भडगाव या ठिकाणी तीन राज्यस्तरीय साहित्य संमेलन ,विद्रोही संमेलन , दोन कविसंमेलने असा प्रवास करीत १२ नोव्हेंबर २ ०१७या दिवशी मेहुणबारे येथिल संत शंकर महाराज (भील ) साहित्य नगरीत , डॉ .तुकाराम रोंगटे ( मराठी विभाग प्रमुख,पुणे विद्यापिठ ) यांचे अध्यक्षतेखाली चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले.संमेलनाचे उद्घाटन कैलास सूर्यवंशी यांनी केले...
प्रथमतः मेहूणबारे सरपंच संघमित्रा चव्हाण यांनी क्रांती मशाल प्रज्वलित केल्यावर , शिस्तबद्धपणे मेहुणबारे येथिल गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या शिक्षण संस्थेतील विदयार्थांची विविधांगी वेशभूषा व तालबद्ध लेझीम नृत्यात , सूर्याच्या पहिल्या किरणांच्या साक्षीने , मेहुणबारे गावात साहित्याचा जागर ग्रंथदिंडी द्वारे सुरु झाला.. ' दिंडीत शालेय विद्यार्थी साहित्यिक व मान्यवर सहभागी झाले होते ....
उद्घाटन सत्र , कथाकथन , परिसंवाद , कविसंमेलन अशा चार सत्रात एकदिवशीय संमेलन मेहुणबारे या ग्रामीण भागात विदयार्थी , साहित्यिक, प्रकाशक , साहित्य रसिकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.
.स्वागताध्यक्ष जिल्हा परिषद सदस्या मोहिनी गायकवाड यांनी सर्व अतिथींच्या स्वागत ,सत्काराची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली..
संमेलनातील त्यांचा उत्साह आदिवासी साहित्य अकादमीला प्रेरणा देणारा ठरला. उद्घाटक शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांच्या हस्ते 'आदिवासी संस्कृतीची जोपासना करण्या बरोबर ज्ञान प्रसार या उद्देशाने' कुंडीत बाण रोवून ' संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले .
या प्रसंगी उद्घाटक कैलास सूर्यवंशी म्हणाले की, सर्व साहित्याची जननी म्हणून आदिवासी साहित्याकडे बघितलं जातं. आदिवासी साहित्य मोठया प्रमाणावर मौखिक आहे. त्यामुळे गैर आदिवासी मंडळींनी आदिवासी साहित्य स्वतःच्या नावाने खपविल्याचे प्रकार घडले आहे.आदिवासी समाजाची फार मोठी परंपरा असून या भारतभूमीचं पांग या आदिवासी विरांनी फेडलं आहे. या संमेलनाचं कौतुक त्यांनी केलं..
या संमेलनाचे वैशिष्ठ्य म्हणजे संमेलनाचे आयोजक व आदिवासी साहित्यिक सुनिल गायकवाड यांनी संशोधन करुन लिहिलेल्या
'आदिवासी लोकसाहित्य व इतिहास' तसेच प्रा.डॉ.संजय लोहकरे यांचे 'आदिवासी साहित्याचा जाहिरनामा' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आदिवासी साहित्य निर्मिती साठी साहित्यिकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने अकादमीच्या निवड समितीकडे आलेल्या विविध साहित्य कृतीतून , रमजान तडवी यांच्या ' बितेल बाता ' या काव्यसंग्रहास आदिवासी साहित्य पुरस्कार संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. तुकाराम रोंगेट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला...
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी साहित्यिक वाहरु सोनवणे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून आदिवासीचा विचार कानाकोपऱ्यात ,पाडयापाडयात पोहोचतोय,आदिवासी संमेलनाच्या चर्चा होतांना दिसताय,साहित्य म्हणजे फक्त पुस्तकात लिहीलेली लिपीबद्ध कथा ,कविता,कादंबरीच नसून मौखिक साहित्य सुद्धा आहे.
'मौखिक साहित्याची प्रेरणा घेवून आदिवासी ,साहित्य जगत असतो. आदिवासीं माणूस म्हणून , समाजाकडून हिणवला गेला, या साठी 'माणूस म्हणून जगण्याचा बंड आदिवासीने पुकारलेला आहे, व त्याचाच भाग आदिवासी साहित्य चळवळीचा आहे.
न्यूटन ने निसर्गाचे नियम शोधले तो वैज्ञानिक ठरला अन जो आदिवासी निसर्ग नियम आत्मसात करुन जीवन जगतो तो अंधविश्वासी कसा? असा प्रश्न विचारत आदिवासी फक्त सामाजिक व वैज्ञानिक प्रयोगाचं माध्यम नाही , तर तो माणूस म्हणून समजला पाहिजे, असं त्यांनी मत मांडलं.
' आदिवासी प्रश्नांना इतर कुठल्याच विचारपिठावर वाचा फोडण्यात आली नाही हे दूर्देव आहे, त्यामुळे स्वतंत्र आदिवासी साहित्य संमेलन भरविण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
. साहित्य हे मूल्य जपतं , प्रबोधन करत ,जीवनाला दिशा देतं. आदिवासी साहित्यिकांचे साहित्य आदिवासी जीवनाच्या मुळात जातात. जीवन प्रणालीत जपलेले मूल्य उजागर करत असतात. " आदिवासी समजून घेतांना जीवन प्रणाली , संस्कृती , समजून घेतली पाहिजे.आदिवासी मध्ये होणारे मरण -तोरण संस्कार विविध उदाहरण व बोलीतील गीतातून समर्पक पणे मांडले.आदिवासींच्या लग्नात ' जवाई मंडळी कष्टाचे काम आनंदाने स्विकारतात.. श्रमप्रतिष्ठा हे मूल्य घेवून आदिवासी जीवन जगतोय..आदिवासी समजून घेतला ,तरच तो समजेल..''त्यासाठी खोल समुद्रात उडी मारली तर मोती सापडेल, किनाऱ्यावर शिंपलेच सापडतील " या शब्दातून सखोल लेखन करण्यावर त्यांनी भर दिला....आदिवासींची धार्मिक ओढाताण करणे व आदिवासींचे वनवासीकरण करणे हा शब्दांचा फेरफारच नाही , तर जीवनपट बदलून टाकणारी गोष्ट आहे..
साहित्यिकांनी आदिवासी जीवनमूल्य , आस्मिता इतिहास पुढे आणला पाहिजे , व लेखकांनी आता या विषयी लिहावे असा
अनमोल सल्ला त्यांनी दिला.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे - ' साहित्य रंभाची अग्र पायरी -आदिवासी साहित्य ' अशी सुरुवात करीत प्रा. डॉ. तुकाराम
रोंगटे म्हणाले की,आर्य सोडले तर या देशातले , या मातीतले आपण सर्व आदिवासी..
लोकसाहित्य मौखिक निट विचारात घ्यावे., आदिवासींचे जागतिक दर्जाचे साहित्य आहे. समानता हा निकष ........ आदिवासी समुदायाचा पूर्न जन्मावर विश्वास नाही हे मौखिक साहित्याची ताकद , क्षमता मोठी आहे,आदिवासी साहित्यात सौंदर्याची खाण आहे.. संत तुकाराम महाराज यांना आदिवासी सोयरा मानतो..
आदिवासी हा शोधांचा प्रतिनिधी असून त्याला पायदळी तुडवून टाकणे योग्य नाही ... शास्त्रज्ञांमध्ये आदिवासी का पुढे तनाही आला?हा गंभीर प्रश्न असून या साठी निरीक्षण करुन नव्याने साहित्याची पूर्नमांडणी करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.आदिवासी आत्महत्या करीत नाही,पर्यावरणाच समतोल राखणारा , नृत्य संस्कृतीत पुढारलेला , वाचन संस्कृतीत मागे का?हे समजून घेण्याची जबाबदारी घ्यावी लागेल.या देशाची 'विक्रमशिला , नालंदा , मुल्लभी , तक्षशिला ही गुण्यागोविंदानं नांदणारी ज्ञान परंपरा, बाहेरुन आलेल्यांनी जाळून टाकली,. नालंदा विदया पिठाला पहाटे जाग यायची आदिवासी स्त्रीयांच्या गीत गायनानं .. ही परंपरा आहे.आदिवासी माणूस साहित्याचा आरंभ बिंदू आहे. अडारकालाम हा गौतम बुद्धाने मानलेला गुरु, ज्याने पिंपळ वृक्षा द्वारे दाखविला ,शांततेचा मार्ग दाखविला हे साहित्यात आलं पाहिजे.
साहित्याची जी बाजू पुढं आली तो हिमनग आहे ,खाली खूप जे दडलय त्याचं उत्खनन करणं ही आता साहित्याची गरज आहे, असं मत त्यांनी अध्यक्षिय भाषणातून व्यक्त केलं.
दुसऱ्यासत्रात डॉ. संजय लोहकरे अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. त्यात प्रा.रामदास गिळंदे मुंबई, प्रमोद नाईक नंदूरबार हे यांनी
आजच्या आदिवासी साहित्याची दिशा व आगामी समस्या आव्हान यावर मत व्यक्त केले. विदयापिठ स्तरावर चर्चासत्र झाले पाहिजे.समिक्षकांमध्ये भर पडली पाहिजे.आमची भाषा आमचे ज्ञान टि. व्ही. वर पाहिजे, या साठी प्रयत्नांची गरज आहे. असे मत मांडण्यात आले.१९६० नंतर महाराष्ट्रात अनेक साहित्य प्रवाह आले.शिक्षण प्रवाह वाढले..जगात २ - आदिवासी व बिगर हे २ प्रवाह हवे.आमच्या पोटातील आग कुणालाच का दिसत नाही.भूकेयी आग मांडणारा साहित्य , त्या समाजाची अर्थव्यवस्था मांडतं...असहकाराची चळवळ करणारा _ बिरसा मुंडा हे सर्व साहित्य चळवळीचे केंद्रबिंदू असावे.आदिवासी साहित्यात महासत्ता बनण्याचं मार्ग आहे...आदिवासी साहित्य हे सामान्य आदिवासी समोर ठेवून लेखन करणे गरजेचे असल्याचे मत डॉ संजय लोहकरे यांनी व्यक्त केले.
प्रा.डॉ.संजय लोहकरे .....परिसंवाद प्रसंगी |
तिसरे सत्रात कथाकथनात प्राचार्य विश्वास पाडोळसे यांच्या अध्यक्षतेखाली
संजय दोबाडे (एक लढाई माळावरची) ही आदिवासी समाजातल्या अन्याय अत्याचारला वाचा फोडणारी कथा सादर केली,
विश्राम वळवी यांनी (कमळी) हि कथा सादर केली. त्यांनी , निसर्गरम्य सातपुडा, गुराखी , कमळी, जेमा ही पात्र श्रोत्यांसमोर उभी केली.
चौथ्या सत्रात साडेतीन तास काव्यसंमेलन चालले. प्राचार्य शिवाजी साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कवी संमेलन झाले.
"वंदितो मी त्या भिमाला
बुद्ध माझ्या अंतरी .....
जीवनाची रित दिधली
या तपस्व्यांनी खरी " ही कविता पुणे येथिल समाधान गायकवाड यांनी सादर केली. त्यामुळे वातावरणात उत्साह संचारला.
तर
माणसांच्या गर्दित
माणसांची कमी होती......
नको असलेल्या स्पर्शाने ती
बेजारलेली दिसत होती ...
या ओळीतून स्त्री वेदना समोर आली.
तर
कवि संदिप ढाकणे यांच्या .. 'वाटणी ' कवितेमधील
' करी जीवाची वाटणी .
.. झाली बायकोही प्यारी
आई बापाच्या नशिबी ..
. आली पंढरीची वारी ' या ओळींनी कौटुंबिक भान जपायचा सल्ला दिला
ती पाहिली मी
जिंदगीच्या कोऱ्या लिफाफ्यावर
मी भुललो कधीच नाही .
तुझ्या त्या फसव्या इशाऱ्यावर ....
या ओळींनी प्रेमभाव जागृत केला..
या साहित्य संमेलनात काव्यवाचनासाठी
राज्यभरातील पुणे, शहादा, शिरपूर, जळगाव , मराठवाडा , या भागातील कवींनी
मराठी ,इंग्रजीसह अहिराणी , गोरमाटी , भिलाऊ , अफानबोलीतील कविता सादर केल्या यात दत्तात्रय कल्याणकर आत्माराम हारे चंद्रकांत जोगदंड ,दिनेश राठोड ,ललिता पाटील , भगवान अहिरे , गुलाबराव मोरे , सोनाली आहिरे, रोशन आहिरे , सोमनाथ देवरे ,अमोल पाटील जितेंद्र चौधरी , राजेंद्र जाधव , प्रा. अशोक वाबळे, निलेश राठोड , प्रणाली निकम , जाफर तडवी, युनुस तडवी , रऊफ तडवी ( तडवी अफानबोली ), प्रा. रमेश धनगर ( अहिराणी ) , एकनाथ गोफणे, ( गोरमाटी ) रमेश बोरसे , एस.के. पाटील... , राम जाधव , संजय सोनार , संदिप ढाकणे , २ाधा काळोखे , किरण साळुंखे, गायत्री साळुंखे रमेश पोतदार , लोकेश पाटील , रोहन खैरनार, साधना निकम . मेहुणाबारे येथिल प्रथम लोकनियुक्त सरपंच संघमित्रा चव्हाण यांनी इंग्रजी कविता सादर केल्या. कविसंमेलनाचे प्रा सदाशिव सुर्यवंशी यांनी बहारदार सुत्रसंचालन केले.
आदिवासी साहित्य अकादमीचं हे चौथं राज्यस्तरीय संमेलन यशस्वी झालं. यंदा प्रथमच सोशल मिडीयावर , युट्यूबवर या संमेलनाचा प्रचार व प्रसार करण्यात आला.
प्रकाशन संस्थांच्या विक्री केंद्रावर विविधांगी आदिवासी साहित्याची खरेदी साहित्यप्रेमींनी केली.
यापुढे होणाऱ्या साहित्य संमेलनात आदिवासी झलक दिसेल, आदिवासी चित्रकार, कलावंतांच्या विविधांगी प्रतिभेचं दर्शन घडेल याची आशा बाळगतो.
या संमेलनाच्या निमित्ताने आदिवासी 'पावरीचा ' सूर साता समुद्रापार उमटला पाहिजे, व निसर्गाशी प्रामाणिक राहून , मूल्याधिष्ठीत , संघर्षमय जीवन जगणारा आदिवासी माणूस संमेलनाच्या माध्यमातून ,भविष्यात विश्व स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी, समृद्ध व्हावा या करीता'आद्य संस्कृतीचा मानबिंदु ' असलेल्या आदिवासी साहित्य अकादमीला हार्दिक शुभेच्छा...
लेखक ... एकनाथ गोफणे.. ८२ ७५७२५४२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपलं मत