लेख.........





सामाजिक विकासाच्या तळमळीतून विवेकवादी चळवळ उभी करणारा कार्यकर्ता----इंदल चव्हाण

भारदस्त आवाजाचा तावडी रत्न -
  शाहिर शिवदास पाटील..

    जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो. तेथे भेट झाली , एका भारदस्त आवाजाच्या ऊर्जावान व्यक्तीमत्वाची . शाहिर शिवदास श्रीपत पाटील यांची. त्यांच्या घरी बसल्यावर त्यांनी कलेच्या जपलेल्या सर्व आठवणींची फाईल माझ्या समोर ठेवली.

१९५५ पासून भजन व नाटक करणाऱ्या , स्वतः संगीत शिक्षण घेऊन , स्वरचित पोवाडे भारदस्त आवाजात सादर करणाऱ्या या लोककलावंताचंं कार्य पाहून खूप आनंद झाला. जपून ठेवलेल्या फाईल मधला एकेक कागद शाहिरांचं कार्य, त्यांची धडपड, जिद्द , आंतरिक प्रेरणा दाखवित होता. फाईल मधले ते कागद नव्हे तर शाहिरांच्या कार्याच्या पाऊलखुणा आहेत. 
      इ.४थी पर्यंत शिक्षण झालेल्या शिवदास पाटील यांच्या कला प्रवासाची उत्सुकता मला होती.एकेक पान मी जाणीवपूर्वक वाचत होतो. १९५७ मध्ये त्यांनी  शाहिरीत आपलं कर्तृव दाखविण्यासाठी 'डफ' हाती घेतला. आपल्या भारदस्त आवाजाने 'वाघूर ' चा परीसर त्यांनी दणाणून सोडला. यापूर्वी  देवपिंप्री नाटय मंडळामार्फत नाट्याभिनय केला. हे मंडळ विविध नाटकांची पुस्तके आणून नाटयसराव करुन सादरीकरण करायचे.पंचक्रोशितील गावासोबत पिंपळगाव. (हरे ),खेडी कढोली,पळासखेडा आदि गावांमध्ये नाटकं सादर केली. 
शाहिर शिवदास पाटील यांनी आकाशवाणी जळगाव केंद्रावर लोकसंगीत कार्यक्रमात अनेक वेळा सादरीकरण केले आहे. देवपिंप्री गावाला एक नवी ओळख देण्याचं कार्य त्यांनी आपल्या कलेतून केलं. 
   कुठलीही वाहन व्यवस्था नसतांना ७ / ८ कि.मी पायी चालत लोकजागर करणारा हा उत्तम कलावंत. तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आवाजातील 'पावनखिंड ' ध्वनिमुद्रिका (कॅसेट ) ऐकून त्यांच्या आवाजातील भारदस्तपणा व गोडीचे कौतुक खास प्रमाणपत्राद्वारे केले आहे. 
जिल्हाधिकारी S.S. संधू यांनी   शाहिरांच्या आवाजातील भारदस्तपणा व गोडीचे कौतुक खास प्रमाणपत्राद्वारे केले आहे. 

शाहिर शिवदास पाटील यांनी शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रम, दारुबंदी प्रचार कार्य, शिक्षण अभियान, जि.प.योजना कार्यक्रम
 यात सहभाग घेऊन शासनाला सहकार्य केलं. या माध्यमातून आपली कला त्यांनी जिल्ह्यासह राज्यातील सुगम, दुर्गम व आदिवासी भागात पोहचविली. कलेतून समाज शिक्षण व जागृतीचं कार्य त्यांनी केलं. यावल, रावेर, चोपडा, जळगाव , जामनेर आदि तालुक्यातील विविध गावं, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमधून त्यांनी राष्ट्रभक्ती जागृत करणारे ,संस्कार देणारे, शिवबांचा ऐतिहासिक पराक्रम सांगणारे, स्वातंत्र्यलढयाचा इतिहास सांगणारे, विरांची शौर्यगाथा , पराक्रम कथन करणारे पोवाडे भारदस्त आवाजात सादर केले. 
        अकोला येथील  वसंत देसाई मैदानात आयोजित एका अधिवेशनात 'कल्याणचा खजिना ' हा पोवाडा सादर करतांना सप्त खंजिरी वादक  सत्यपाल महाराजांनी खंजेरीची साथ दिल्याची आठवण ते सांगतात.
   आजही शाहिर  शिवदास पाटील ८० व्या वर्षी त्याच नव्या उत्साहाने शाळा व विद्यालयांमध्ये पोवाड्यांचे सादरीकरण करुन
 शाळेत पोवाड्यांचे सादरीकरण

शौर्य , पराक्रमाचा इतिहास सांगतात, पर्यावरणाचं रक्षण करण्याची गोष्ट बालमनावर रुजवतात. आवाजात तोच भारदस्तपणा आजही त्यांनी टिकवून ठेवला , हे विशेष.
दारुबंदी (शिक्षण ) संचालनालयाने त्यांना सन्मानपत्राने सन्मानित केले असून जामनेर येथे डिसेंबर २०१८ मध्ये संपन्न झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनात शाहिर  शिवदास पाटील  यांच्या शाहिरी कलेची दखल घेत त्यांना 'तावडी रत्न ' पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले.
शाहिर शिवदास पाटील यांचे कार्य राज्यभरात नेण्यासाठी स्वयंसेवी संस्था व शासनाने त्यांना सहकार्य केले पाहिजे. जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्काराने सुद्धा हा तावडी रत्न सन्मानित झाला पाहिजे. 
  शाहिर शिवदास श्रीपत पाटील यांच्या भावी आयुष्याला हार्दिक शुभेच्छा.
.......
लेखक ... एकनाथ लक्ष्मण गोफणे.. 
८३२९४७७३००
******************************************




....__ लेख___________________________________________
                                              
                   ~~~~विषय~~~                      ~

गोर बंजारा समाजप्रबोधनात शाहिरांचे (भजन्यांचे )योगदान : -
      मानवजीवन व निसर्गाचं एक अतुट नातं आहे. आदिमानव ते आत्ताचा प्रगत मानव हा मानवाच्या विकसित अवस्थेच्या टप्पा. नैसर्गिक बाबी मानवी जीवनाच्या समृद्धी साठी आवश्यक .निसर्गाचं निरिक्षण करीत , त्याच्या ऋतू चक्राचा अभ्यास, बदलत्या वातावरणाची स्थिती जाणून , नैसर्गिक संकेत , झाडं वेली, नदी, डोंगर, पशू पक्षी यांचं पंचेंद्रियांद्वारे  ज्ञान मिळाल्यावर त्याचं कौशल्यात्मकपणे उपयोजन करुन जीवन जगण्याची कला माणूस शिकला. याच मानवी जीवन समुहात बंजारा लोकसमुह पण राहत होता व जीवन जगत होता. बंजारा व्यक्ती  , सामाजिक आर्थिक ,राजकिय संघर्ष करीत   तांड्याचा भाग उदर निर्वाहासाठी आपलं  कुटूंब घेऊन देशभर वेळोवेळी स्थलांतरीत होत होता.  या स्थलांतरात तो निसर्गाशी जवळीक साधत मानसिक आनंद शोधत होता.
   त्यातून काही निपूण बंजारा व्यक्ती आपल्या नैसर्गिक सृजनशक्तिने , आपल्या कल्पनेने नवनिर्मिती करीत
स्वतःच्या तालवाद्य , तंतूवाद्यातून संगीत निर्माण करुन काव्यरचना तयार करुन , भटकंती करुन थकलेल्या आपल्या बंजारा बांधवांसाठी गीत संगीताच्या माध्यमातून आनंद देण्याचा , थकलेल्या मन व शरीराला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न करीत असत.       
          भोळ्या भाबडया बंजारांना फसविणारी , त्यांचे शोषण करणारी , त्यांचा आवाज दाबून टाकणारी , त्यांच्यात अंधश्रद्धा पसरवून त्यांना दुःखाच्या दरीत ढकलून स्वतःचा स्वार्थ साधणारी काही पाखंडी मंडळी त्या काळातही तांडयात होती.
या भोळ्या भाबडया कष्टाळू समाजाचे दुःख जाणून , त्यांना सुखी जीवन जगता यावे म्हणून तळमळणारी सदविचारी माणसं पण तांड्याच्या सोबत होती. यातील काही  माणसं मार्मिकपणे आपल्या बोलीतून , मनामनाला जागृत करीत , सकारात्मक ऊर्जा देण्याचं , जनप्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचं प्रभावी कार्य करीत होती. 
      शब्दांच शस्त्र व पारंपारिक वाद्यांची साथ, कल्पकतेची जोड यामुळे , सर्जनशिल चिकित्सक विचार काव्यात्म पद्धतीने सादर करीत असत.बजारांच्या स्वभाषेच्या , 'लहेजा ' मध्ये विविधता असली तरीसंपूर्ण भारतातील भाषा एक सारखीच जाणवते. या भाषेला स्वतंत्र  लिपी नाही म्हणून बोलण्याची , सामाजिक व्यवहाराची भाषा व शिकण्याची भाषा यात भिन्नता आढळते. या स्थितीतही आपल्या  बोलीचं सौंदर्य जपत 
बोली जगविण्याचं काम, परंपरा जतन करुन , समृद्ध विचार , नवा दृष्टीकोन , थाळी नंगारा या पारंपारीक वाद्यासह गायन करुन  ' ऐकणाऱ्यांच्या कानाद्वारे मनामनात ' जाणिव जागृती करीत सामाजिक समृद्धीचा विचार पोहोचविण्याचं , उत्तम कार्य या बंजारा समाजातील गायन करणाऱ्या मंडळीने केलं. .    
थाळी नंगारा चा स्वतंत्र संगीत साज हा मनात तरंग निर्माण  करतो. 
आजच्या सारखी पूर्वीच्या काळी मनोरंजन व प्रबोधनाची प्रगत साधने नव्हती. या वेळेपासून आपल्या समाजाला जागृत करण्याचं कार्य गोर बंजारा समाजात होत होतं , ही बाब सामाजिक  प्रगतीचा रथ पुढे नेणारी आहे.कला ही मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण करते. हे सामाजिक चैतन्य आणण्याचं कार्य गोर बंजारा समाजातील या कलावंतांनी केलं.
 आजही अनेक तांड्यांमध्ये ही प्रबोधन परंपरा अविरत सुरु आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासोबत मूल्याधिष्ठीत समाज निर्मितीचं व्रत या समाजातीत भजनकरी , शाहीरीकलावंतांनी केलं. नवसमाज निर्मितीसह ,सामाजिक दोष दूर करण्यासाठी या मंडळींनी आतोनात प्रयत्न केले. पुरुषांप्रमाणे स्त्रियांचापण या प्रबोधनात वाटा आहे.
बंजारा तांडयातील अनेकांच्या मनांमध्ये  या थाळीनंगारा भजनकलेची आठवण कायम आहे.तांडयातील एखादया मोकळ्या जागेत , मंदिरांच्या ओट्यावर रात्रभर चालणारा हा प्रबोधन प्रकार मी बऱ्याचदा बघीतला आहे. आपल्या आंतरीक कौशल्यांनं शब्दांची कल्पक रचना करुन प्रबोधनात्मक सादरीकरणातून समाजाला जागृत करणाऱ्या, या जागल्यांच कार्य कौतुकास्पद होते. हुंडा समस्या , व्यसनाधिनता, सामाजिक घातक रुढींवर प्रहार करणारी या भजनकरी मंडळींची तळमळ मी स्वतः अनुभवली, ऐकली आहे.
 या थाळी नंगारा समुहाची सादरीकरणाची लयबद्धता अतुलनिय होती. स्वयंशिस्त हा गुण , आवाजातील चढ - उतार,समय सुचकता हा गुण, सामाजिक भान व झिलकरी ची साथ हे तांडयामधील वास्तव्यात प्रत्यक्ष पाहिलेलं दृश्य आजही माझ्या मनात कायम आहे. 
या गोर बंजारा समाजाच्या ,प्रबोधनात या शाहिरांचे (भजन्यांचे )योगदान मला खरचं लाख मोलाचे वाटतात.
जळगाव , नागपूर , पुणे यासह आकाशवाणीच्या लोकसंगीत या कार्यक्रमात बंजारा भाषेतील ही  गीते आजही मनाला आनंद देतात. नेहमीची भटकंती व विभिन्न अडचणींमुळे पुस्तकी शिक्षण न घेणाऱ्या व परिणामी वाचनापासून दूरावलेल्या समाजमनाला शिकविण्याचं मोठ्ठं कार्य , गायन वादन कलेतून प्रबोधन करणाऱ्या या कलावंतांनी केलं ही गौरवास्पद बाब म्हटली पाहिजे.
तांडया तांडयांमध्ये रात्रीच्या सादरीकरणावेळी या कलावंतांच्या कलेचा सन्मान , त्यांच्या गुणांची तारीफ ऐकणारे श्रोते रोख रक्कम स्वरुपात बक्षिस देवून करायचे. त्यावेळी 'मुख्य गायक ' आपल्या हजरजबाबीपणाने, शिघ्र चारोळी तयार करुन थाळीनंगाराच्या तालावर बक्षिस देणाऱ्यांचा जो नामोल्लेख करायचा तो इतरांसाठी सुखद व प्रेरणादायी असायचा. बक्षिस रोख देण्याची स्पर्धा श्रोत्यांमध्ये लागायची. हे बघतांना व ऐकतांना मला खूप आनंददायी वाटायचं.  

या प्रबोधनकारांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत जगत, दिवसा , मोलमजुरी करुन समाजाच्या उत्थानासाठी , प्रबोधनाच्या रुपात दिलेले योगदान बंजारा समाज कदापी  विसरणार नाही , याचा मला ठाम विश्वास आहे.
 ३ फेब्रुवारी २०१९ रोजी 
  मा . प्रेमदास महाराज वनोलीकर , यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे पाहिले अ . भा . गोर बंजारा भजनकरी / शाहीर कला संमेलन संपन्न होत आहे , ही लाख मोलाची बाब मी समजतो . या बंजारा समाजाचं प्रबोधन  करणाऱ्यांप्रती कृतज्ञ होण्याचा भाव व समाजाने केलेला, बंजारा बोलीतून ,प्रबोधन करणाऱ्यांचा हा  सन्मान मी समजतो.
     भारतातील विविध राज्यात , तसेच  महाराष्ट्रात ,जळगाव जिल्ह्यासह खान्देशात थाळी, नंगारा या पारंपारीक वाद्यासह समाजप्रबोधन करणाऱ्यांची परंपरा आहे,  जेता धना राठोड, भिका दगडू राठोड  हे आज देहाने नाही पण आकाशवाणीवर लोकसंगीत कार्यक्रमात प्रसारीत होणाऱ्या गीद गायनाच्या माध्यमातून जीवंत आहेत.  चाळीसगाव तालुक्यातील बोढरे , सांगवी येथील बंजारा लोकगीत गायन समुह , भडगाव तालुक्यातील मोरासिंग राठोड, अरुण चव्हाण, शेजारील ,नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथिल गणेश गोविंदा , करगाव तांडा ता. चाळीसगाव  येथिल विष्णु सिताराम राठोड व सहकारी व धुळे नंदूरबार जिल्ह्यातील काही निवडक तांड्यामधील मंडळी ही परंपरा पुढे नेत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.
व्यसनमुक्त समाज, हुंडाबंदी, स्वच्छता अभियान, कुटूंब नियोजन , लेक वाचवा लेक शिकवा , प्रामाणिकपणा , पर्यावरण रक्षण या विषयावर सुद्धा वर्तमान युगात हे प्रबोधनकार जागृती करतांना आढळतात. तंत्रज्ञानाच्या युगात विविध समाज माध्यमातून कलेच्या प्रचारा सोबत सामाजिक विचार जनमानसात ही मंडळी अविरत पणे पोहोचवित आहेत.
या प्रबोधन कारांच्या उत्थानासाठी , सामाजिक विकासाला गती देण्यासाठी समाजातील विविध सेवाभावी संस्था , व्यक्ती व समुह यांनी या प्रबोधनकारांचे कलात्मक , व 
नव तंत्रज्ञानाधारीत  प्रशिक्षण घेण्याचं नियोजन करावं. दरवर्षी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे थाळी नंगारा भजन स्पर्धा घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. शासनाच्या लोकोपयोगी उपक्रमांच्या प्रचार व प्रसारासाठी प्रबोधनकारांना तांडया - तांड्यात मानधन तत्वावर काम दिलं पाहिजे. वृद्ध कलावंतांना पेन्शन दिलं पाहिजे. मुक्त विद्यापीठांमार्फत थाळीनंगारा गायन वादन प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवून या कलेचं जतन केलं पाहिजे. आगामी काळात दिल्ली व मुंबई येथे १५ ऑगस्ट / २६ जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत बंजारा भजन / शाहीरी कलेला स्थान मिळालं पाहिजे.
गोर बंजारा समाजप्रबोधनात शाहिरांचे (भजन्यांचे )योगदान खूप मोठे आहे. अविरतपणे हा प्रबोधनाचा रथ पुढे नेत सामाजिक विकासाचा प्रयत्न करणारे हे प्रबोधनकार आगामी काळात आधिक जोमाने कार्य करतील, व विवेकवादी दृष्टीकोन असलेला , संविधानात्मक विचार असलेल्या समाजाच्या निर्मिती व विकासासाठी जाणिवपूर्वक कार्य करतील असा मला विश्वास वाटतो...............



लेखक ... एकनाथ लक्ष्मण गोफणे.. 
८३२९४७७३००





_________________________________________________ लेख_____________________________________________
'आद्य संस्कृतीचा मानबिंदू '


'आदय संस्कृतीचा मानबिंदु 'हे ब्रीदवाक्य घेवुन महाराष्ट्र राज्यात आदिवासी साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त करुन  देणारे , एकमेव विचारपीठ ,आदिवासी साहित्यासाठी असलेली चळवळ  म्हणजे आदिवासी साहित्य अकादमी ..
  या आदिवासी साहित्य अकादमीने ‘शाहू फुले आंबेडकरांची प्रेरणा घेऊन वंचितांचा  आवज होण्याचा प्रयत्न सुरु केलाय...
२०१२ पासून या अकादमीने साहित्याच्या क्षेत्रात दमदार पाऊले टाकायला प्रारंभ केला. 
. यापूर्वी जळगाव जिल्हयातच ३ संमेलने झालीत., टाकळी प्र.चा.,कजगाव , भडगाव या ठिकाणी तीन राज्यस्तरीय साहित्य संमेलन ,विद्रोही संमेलन , दोन कविसंमेलने  असा प्रवास करीत १२ नोव्हेंबर  २ ०१७या दिवशी  मेहुणबारे येथिल संत शंकर महाराज (भील ) साहित्य नगरीत , डॉ .तुकाराम रोंगटे   ( मराठी विभाग प्रमुख,पुणे विद्यापिठ )  यांचे अध्यक्षतेखाली चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले.संमेलनाचे उद्घाटन कैलास सूर्यवंशी यांनी केले...
प्रथमतः मेहूणबारे सरपंच संघमित्रा चव्हाण यांनी क्रांती मशाल प्रज्वलित केल्यावर , शिस्तबद्धपणे मेहुणबारे येथिल गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या शिक्षण संस्थेतील विदयार्थांची विविधांगी वेशभूषा व तालबद्ध लेझीम नृत्यात , सूर्याच्या पहिल्या किरणांच्या साक्षीने , मेहुणबारे गावात साहित्याचा जागर ग्रंथदिंडी द्वारे सुरु झाला.. ' दिंडीत शालेय विद्यार्थी साहित्यिक व मान्यवर सहभागी झाले होते  ....
उद्घाटन सत्र , कथाकथन , परिसंवाद , कविसंमेलन अशा चार सत्रात एकदिवशीय संमेलन मेहुणबारे या ग्रामीण भागात विदयार्थी , साहित्यिक, प्रकाशक , साहित्य रसिकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.
.स्वागताध्यक्ष जिल्हा परिषद सदस्या मोहिनी गायकवाड यांनी सर्व अतिथींच्या स्वागत ,सत्काराची जबाबदारी उत्तमरित्या  सांभाळली..
संमेलनातील त्यांचा उत्साह आदिवासी साहित्य अकादमीला प्रेरणा देणारा ठरला.  उद्घाटक शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांच्या हस्ते 'आदिवासी संस्कृतीची जोपासना करण्या बरोबर ज्ञान प्रसार या उद्देशाने' कुंडीत बाण रोवून ' संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले . 
या प्रसंगी उद्घाटक कैलास सूर्यवंशी म्हणाले की, सर्व साहित्याची जननी म्हणून आदिवासी साहित्याकडे बघितलं जातं. आदिवासी साहित्य मोठया प्रमाणावर मौखिक आहे. त्यामुळे गैर आदिवासी मंडळींनी आदिवासी साहित्य स्वतःच्या नावाने खपविल्याचे प्रकार घडले आहे.आदिवासी समाजाची फार मोठी परंपरा असून या भारतभूमीचं पांग या आदिवासी विरांनी फेडलं आहे. या संमेलनाचं कौतुक त्यांनी केलं..
या संमेलनाचे वैशिष्ठ्य म्हणजे संमेलनाचे आयोजक व आदिवासी साहित्यिक सुनिल गायकवाड यांनी संशोधन  करुन लिहिलेल्या 

'आदिवासी लोकसाहित्य व इतिहास'  तसेच     प्रा.डॉ.संजय लोहकरे यांचे 'आदिवासी साहित्याचा जाहिरनामा' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.   

       आदिवासी साहित्य निर्मिती साठी साहित्यिकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने अकादमीच्या निवड समितीकडे आलेल्या विविध साहित्य कृतीतून  , रमजान तडवी यांच्या ' बितेल बाता ' या  काव्यसंग्रहास आदिवासी साहित्य पुरस्कार संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. तुकाराम रोंगेट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला...
         या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून   आदिवासी साहित्यिक  वाहरु सोनवणे  उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून आदिवासीचा विचार कानाकोपऱ्यात ,पाडयापाडयात पोहोचतोय,आदिवासी संमेलनाच्या चर्चा होतांना दिसताय,साहित्य म्हणजे फक्त  पुस्तकात लिहीलेली लिपीबद्ध कथा ,कविता,कादंबरीच नसून मौखिक साहित्य सुद्धा आहे.
 'मौखिक साहित्याची प्रेरणा घेवून आदिवासी  ,साहित्य जगत असतो. आदिवासीं माणूस म्हणून , समाजाकडून हिणवला गेला, या साठी 'माणूस म्हणून जगण्याचा बंड आदिवासीने  पुकारलेला आहे, व त्याचाच भाग आदिवासी साहित्य चळवळीचा आहे.

न्यूटन ने निसर्गाचे नियम शोधले तो वैज्ञानिक ठरला अन जो आदिवासी निसर्ग नियम आत्मसात करुन जीवन जगतो तो अंधविश्वासी कसा? असा प्रश्न विचारत आदिवासी फक्त सामाजिक व वैज्ञानिक प्रयोगाचं माध्यम नाही , तर तो माणूस म्हणून समजला पाहिजे, असं त्यांनी मत मांडलं.
 ' आदिवासी प्रश्नांना इतर कुठल्याच विचारपिठावर वाचा फोडण्यात आली नाही हे दूर्देव आहे, त्यामुळे स्वतंत्र आदिवासी साहित्य संमेलन भरविण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
. साहित्य हे मूल्य जपतं ,  प्रबोधन करत ,जीवनाला दिशा देतं. आदिवासी साहित्यिकांचे साहित्य आदिवासी जीवनाच्या मुळात जातात. जीवन प्रणालीत जपलेले मूल्य उजागर करत असतात. " आदिवासी समजून घेतांना जीवन प्रणाली , संस्कृती , समजून घेतली पाहिजे.आदिवासी मध्ये होणारे मरण -तोरण संस्कार विविध उदाहरण व बोलीतील गीतातून समर्पक पणे मांडले.आदिवासींच्या लग्नात ' जवाई मंडळी कष्टाचे काम आनंदाने स्विकारतात.. श्रमप्रतिष्ठा  हे मूल्य घेवून आदिवासी जीवन जगतोय..आदिवासी समजून घेतला ,तरच तो समजेल..''त्यासाठी खोल समुद्रात उडी मारली तर मोती सापडेल, किनाऱ्यावर  शिंपलेच सापडतील " या शब्दातून सखोल लेखन करण्यावर त्यांनी भर दिला....आदिवासींची धार्मिक ओढाताण करणे व आदिवासींचे वनवासीकरण करणे हा शब्दांचा फेरफारच  नाही , तर जीवनपट बदलून टाकणारी गोष्ट आहे..
साहित्यिकांनी आदिवासी जीवनमूल्य , आस्मिता  इतिहास पुढे आणला  पाहिजे , व लेखकांनी आता या विषयी लिहावे असा
अनमोल सल्ला त्यांनी दिला.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे -    ' साहित्य रंभाची अग्र पायरी -आदिवासी साहित्य ' अशी सुरुवात करीत  प्रा. डॉ. तुकाराम
रोंगटे म्हणाले की,आर्य सोडले तर या देशातले , या मातीतले आपण सर्व आदिवासी..
लोकसाहित्य मौखिक निट विचारात घ्यावे., आदिवासींचे जागतिक दर्जाचे साहित्य आहे. समानता हा निकष ........ आदिवासी समुदायाचा पूर्न जन्मावर विश्वास नाही हे मौखिक साहित्याची ताकद , क्षमता मोठी आहे,आदिवासी साहित्यात सौंदर्याची खाण आहे.. संत तुकाराम महाराज यांना आदिवासी सोयरा मानतो..

आदिवासी हा शोधांचा प्रतिनिधी असून  त्याला पायदळी तुडवून टाकणे योग्य नाही ... शास्त्रज्ञांमध्ये आदिवासी   का पुढे तनाही आला?हा गंभीर प्रश्न असून या साठी निरीक्षण करुन नव्याने साहित्याची पूर्नमांडणी करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.आदिवासी आत्महत्या करीत नाही,पर्यावरणाच समतोल राखणारा , नृत्य संस्कृतीत पुढारलेला ,  वाचन संस्कृतीत मागे का?हे समजून घेण्याची जबाबदारी  घ्यावी लागेल.या देशाची 'विक्रमशिला , नालंदा , मुल्लभी , तक्षशिला ही गुण्यागोविंदानं नांदणारी ज्ञान परंपरा, बाहेरुन आलेल्यांनी जाळून टाकली,. नालंदा विदया पिठाला पहाटे जाग यायची आदिवासी स्त्रीयांच्या गीत गायनानं .. ही परंपरा आहे.आदिवासी माणूस साहित्याचा आरंभ बिंदू आहे.    अडारकालाम हा  गौतम बुद्धाने मानलेला गुरु, ज्याने   पिंपळ वृक्षा द्वारे दाखविला ,शांततेचा मार्ग दाखविला हे साहित्यात आलं पाहिजे.
 साहित्याची जी बाजू पुढं आली तो हिमनग आहे ,खाली खूप जे दडलय त्याचं उत्खनन करणं ही आता साहित्याची गरज आहे, असं मत त्यांनी अध्यक्षिय भाषणातून व्यक्त केलं.

     
दुसऱ्यासत्रात  डॉ. संजय लोहकरे अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. त्यात  प्रा.रामदास गिळंदे मुंबई, प्रमोद नाईक नंदूरबार हे यांनी 
प्रा.डॉ.संजय लोहकरे .....परिसंवाद प्रसंगी  
आजच्या आदिवासी साहित्याची दिशा व आगामी समस्या आव्हान यावर मत व्यक्त केले. विदयापिठ स्तरावर चर्चासत्र झाले पाहिजे.समिक्षकांमध्ये भर पडली पाहिजे.आमची  भाषा आमचे  ज्ञान टि. व्ही. वर पाहिजे, या साठी प्रयत्नांची गरज आहे. असे मत मांडण्यात आले.१९६० नंतर महाराष्ट्रात अनेक साहित्य प्रवाह  आले.शिक्षण प्रवाह वाढले..जगात २ - आदिवासी व बिगर हे २ प्रवाह हवे.आमच्या पोटातील आग कुणालाच का दिसत नाही.भूकेयी आग मांडणारा साहित्य , त्या समाजाची अर्थव्यवस्था मांडतं...असहकाराची चळवळ करणारा _ बिरसा मुंडा हे सर्व साहित्य चळवळीचे केंद्रबिंदू असावे.आदिवासी साहित्यात महासत्ता बनण्याचं मार्ग आहे...आदिवासी साहित्य हे सामान्य आदिवासी समोर ठेवून लेखन करणे गरजेचे असल्याचे मत डॉ संजय लोहकरे यांनी व्यक्त केले.



तिसरे सत्रात कथाकथनात प्राचार्य विश्वास पाडोळसे यांच्या अध्यक्षतेखाली
 संजय दोबाडे (एक लढाई माळावरची) ही आदिवासी समाजातल्या अन्याय अत्याचारला वाचा फोडणारी कथा सादर केली,
विश्राम वळवी यांनी  (कमळी) हि कथा सादर केली. त्यांनी , निसर्गरम्य सातपुडा,  गुराखी , कमळी, जेमा ही पात्र श्रोत्यांसमोर उभी केली.
चौथ्या सत्रात साडेतीन तास काव्यसंमेलन चालले.  प्राचार्य शिवाजी साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कवी संमेलन झाले.
"वंदितो मी त्या भिमाला
बुद्ध माझ्या अंतरी .....
जीवनाची रित दिधली
या तपस्व्यांनी खरी " ही कविता पुणे येथिल समाधान गायकवाड यांनी सादर केली. त्यामुळे वातावरणात उत्साह संचारला.
तर

 माणसांच्या गर्दित
 माणसांची कमी होती......
नको असलेल्या स्पर्शाने ती
बेजारलेली दिसत होती ...
या ओळीतून स्त्री वेदना समोर आली.
तर
कवि संदिप ढाकणे यांच्या .. 'वाटणी ' कवितेमधील
करी जीवाची वाटणी .
.. झाली बायकोही प्यारी
आई बापाच्या नशिबी ..
. आली पंढरीची वारी '  या ओळींनी कौटुंबिक भान जपायचा सल्ला दिला
 ती पाहिली मी
जिंदगीच्या कोऱ्या लिफाफ्यावर
मी भुललो कधीच नाही .
तुझ्या त्या फसव्या इशाऱ्यावर ....
या ओळींनी प्रेमभाव जागृत केला..

या साहित्य संमेलनात काव्यवाचनासाठी
 राज्यभरातील पुणे, शहादा, शिरपूर, जळगाव , मराठवाडा , या भागातील  कवींनी
मराठी ,इंग्रजीसह अहिराणी , गोरमाटी , भिलाऊ , अफानबोलीतील कविता सादर केल्या यात दत्तात्रय कल्याणकर आत्माराम हारे  चंद्रकांत जोगदंड  ,दिनेश राठोड ,ललिता पाटील , भगवान अहिरे , गुलाबराव मोरे , सोनाली आहिरे, रोशन आहिरे , सोमनाथ देवरे ,अमोल पाटील  जितेंद्र चौधरी , राजेंद्र जाधव , प्रा. अशोक वाबळे, निलेश राठोड , प्रणाली निकम , जाफर तडवी, युनुस तडवी , रऊफ तडवी ( तडवी अफानबोली ), प्रा. रमेश धनगर ( अहिराणी ) , एकनाथ गोफणे, ( गोरमाटी ) रमेश बोरसे , एस.के. पाटील...  , राम जाधव , संजय सोनार , संदिप ढाकणे , २ाधा काळोखे , किरण साळुंखे, गायत्री साळुंखे रमेश पोतदार , लोकेश पाटील , रोहन खैरनार,  साधना निकम . मेहुणाबारे येथिल प्रथम लोकनियुक्त सरपंच संघमित्रा  चव्हाण यांनी इंग्रजी कविता सादर केल्या.      कविसंमेलनाचे  प्रा सदाशिव सुर्यवंशी यांनी बहारदार  सुत्रसंचालन केले.
आदिवासी साहित्य अकादमीचं हे चौथं राज्यस्तरीय संमेलन यशस्वी झालं. यंदा प्रथमच सोशल मिडीयावर , युट्यूबवर या संमेलनाचा प्रचार व प्रसार करण्यात आला.
प्रकाशन संस्थांच्या विक्री केंद्रावर विविधांगी आदिवासी साहित्याची खरेदी साहित्यप्रेमींनी केली.
यापुढे होणाऱ्या साहित्य संमेलनात आदिवासी झलक दिसेल, आदिवासी चित्रकार, कलावंतांच्या विविधांगी प्रतिभेचं दर्शन घडेल याची आशा बाळगतो.
         या संमेलनाच्या  निमित्ताने आदिवासी 'पावरीचा ' सूर साता समुद्रापार  उमटला पाहिजे, व निसर्गाशी प्रामाणिक राहून , मूल्याधिष्ठीत , संघर्षमय जीवन जगणारा आदिवासी माणूस संमेलनाच्या माध्यमातून ,भविष्यात विश्व स्तरावर  भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी, समृद्ध व्हावा या करीता'आद्य संस्कृतीचा मानबिंदु ' असलेल्या  आदिवासी साहित्य अकादमीला हार्दिक शुभेच्छा...

                 लेखक ... एकनाथ गोफणे.. ८२ ७५७२५४२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपलं मत

माझी लेखणी

गोरबोली भाषा .. कविता.

 अहिराणी -लावणी . जाऊ नका बाहेर .= आभाय आज ,भरी वूनं  गरजी ऱ्हायनं भारी......... चमकी ऱ्हायन्या इजा आज     जीव मना  गया  घाबरी... बरसी ऱ्हाय...